Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुराच्या पाण्यात पडल्याने वरणगाव फॅक्टरी कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचा लवकी नाल्यातील पुरातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  शुभम बबलू तायडे (23, आनंद नगर, भुसावळ) असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम तायडे हा तरुण फॅक्टरीत दरबान पदावर कार्यरत होता. रविवारी १० सप्टेंबर रोजी साडेसात वाजता तो ड्युटीवर जाण्यासाठी भुसावळातून निघाला मात्र लवकीच्या नाल्याला पूर असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तो नाल्यात पडला.  वरणगाव येथील मयूर जावळे यांना दूरध्वनीद्वारे इंटकचे महासचिव महेश पाटील यांना लवकी नाल्यात फॅक्टरीचे स्टिकर लावलेली मोटरसायकल पडलेली असल्याची माहिती दिल्यानंतर खातरजमा केली असता दुचाकी शुभम तायडेची असल्याचे त्यांच्या लक्षात आले तर नाल्याच्या किनार्‍यावर १०० मीटर अंतरावर शोध घेतल्यानंतर शुभम तायडे हा झुडूपांमध्ये मयत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वरणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला. पुढील तपास  वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Exit mobile version