Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

 

पंढरपूर । विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कालच या मंदिराला उघडण्यासाठी आंदोलन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची बाब विशेष आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन केले होते. या आंदोलनापुरते पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले होते. १० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, आज मंदिर समितीनेच ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रक काढून याची माहिती दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे खबरदारी च्या उपाययोजना म्हणून भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर १७/३/२०२० ते ३१/८/२०२० पर्यंत बंदच ठेवण्यात आले होते. राज्य सरकारनेही जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नोटिसीमध्ये राज्यातील मंदिरे ३१ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार असल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. या दरम्यानचे सणवार, उत्सव परंपरेनुसार साधेपणाने साजरे केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version