Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर

मुंबई- राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे.  

आजही सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली आहे. दिवसभरात ८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी  गेले.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ५ हजार ४१५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७७ लाख ६२ हजार ००५ नमुन्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख ३७ हजार ८९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

Exit mobile version