Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोधकांना त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजेंडा

 

मुंबई: वृत्तसंस्था । ‘इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवून राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजेंडा आहे. मलाही इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. आमच्यासारख्या काही लोकांवर त्यांचं विशेष प्रेम आहे,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला हाणला आहे.

केंद्र सरकारनं आणलेला कृषी कायदा व त्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. केंद्र सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. ‘आयकर विभागानं २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात मला नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल काही तक्रारी आहेत. त्यांच्यानंतर मलाही नोटीस आली आहे. सुप्रियाला काल दिली जाणार होती, पण आधी मला आली. तिला देखील नोटीस येणार आहे असं कळलंय. चांगली गोष्ट आहे. आमच्याबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे, असं पवार म्हणाले.

‘निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मला नोटीस पाठवण्यात आली आहे. काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. लवकरच मी त्यास उत्तर देणार आहे. उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड भरावा लागेल असंही त्यात नमूद करण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं.

कोरोना रुग्णांची महाराष्ट्रात वाढत असलेली संख्या, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, कंगना राणावत व शिवसेनेमधील वादाचं निमित्त करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात होती. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा यांच्यासह काही जणांनी तशी मागणी केली होती. ही मागणी करणाऱ्या शरद पवारांनी टोला हाणला. ‘राष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे गंमत नव्हे आणि महाराष्ट्रात त्याची काही गरज नाही,’ असं पवार म्हणाले.

Exit mobile version