रावेर प्रतिनिधी । तापी नदीला आलेल्या पूरामुळे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदीच्या पूराचा बॅक वाटरमुळे रावेर तालुक्यातील पुल व रस्ता पाण्याखाली गेले आहे. तर तापी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा महसूल प्रशासना तर्फे देण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, मध्य प्रदेशयात जोरदार पाऊस झाल्याने तापी नदी दुथळी भरून वाहत आहे. यामुळे पूराच्या बॅक वाटरमुळे खिरवड ते नेहेते दरम्यान पूल, निंभोरासिम ते विटवे दरम्यान पूल व ऐनपूर निंबोल रस्त्यावर तापीचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान तसिलदार उषाराणी देवगुणे यांनी पाण्यामुळे बाधित झालेल्या गावांना भेट दिली तसेच नदी काठच्या सर्व गावांमध्ये सतर्कतेच्या दवंडी मार्फत सूचना देण्याचे कोतवालास व स्थानिक पोलिस पाटील यांना दिल्या आहे. सद्यास्थिती मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमा लगत भागात पाऊस सुरु असून रात्री देखिल नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर महसूल व पोलिस प्रशासन सज्ज आहे.