रावेर, प्रतिनिधी | विज्ञान युगात वावरत असतांना आजही आदिवासी आणि मागास ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अनेक निष्पाप लोक आजही बळी पडत आहेत, अशी खंत अंधश्रद्धा निर्मूलन प्रचारक श्रीकृष्ण धोटे यांनी येथील पोलीस स्टेशनात आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे, पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार, दक्षता समिती अध्यक्षा कांताताई बोरा, कामगार नेते दिलीप कांबळे, मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष शे गयास, युसूफ खा कांताबाई बोरा सुनीता डेरेकर कल्पना पाटील सुवर्णा भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री धोटे यांनी भूत, भानामती, चमत्कारिक आर्थिक प्राप्ती, अघोरी प्रथा, करणी, जादूटोणा, अंगात येणे, मंत्र-तंत्र, साप-विंचू उतरवण्यासाठीचे उपाय, रक्त विरहित शस्त्रक्रिया आदी प्रकारची अंधश्रद्धा आपल्या विनाशाला कारणीभूत ठरत असते, असे सांगितले. सण कोणतेही वाईट नसतात, आपण कृत्य वाईट करीत असतो. साप निघाला तर आपण लगेच मारून टाकतो पण नागपंचमीला सापाची पूजा करण्यासाठी दगडाची मूर्ती शोधतो. असे मार्गदर्शन करत असताना त्यांनी नारळातून कापड व फुले काढणे, रिकाम्या तांब्यातून पाणी काढणे, भोंदूबाबाची कारस्थाने, हातावर नारळ उभे राहणे, नारळ आपोआप चालणे, मंत्राने होम हवन आपोआप पेटवणे आदी प्रयोग करून दाखवले.