विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवावे – प्रा. डॉ.व्ही. एल. माहेश्वरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  यशस्वी होण्यासाठी ज्ञानाबरोबर प्रामाणिकपणा आणि संभाषण कौशल्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवावे तसेच वेळेचे काटेकोर नियोजन करावे, अशा मौलिक सूचना कुलगुरू प्रा. डॉ.व्ही.एल माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. ते विद्यापीठात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महारष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या वतीने “युवारंग-२०२१” महोत्सवातील विजेत्या स्पर्धक आणि विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी –शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन अधिसभा सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी कुलगुरू प्रा. डॉ.व्ही.एल माहेश्वरी यांच्या हस्ते युवारंग महोत्सवातील विजेत्या स्पर्धक आणि सामाजिक शास्त्रे प्रशाळेतील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी–शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विचारमंचावर सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक डॉ. अजय पाटील, मानवविद्या प्रशाळेचे संचालक डॉ. अनिल चिकाटे आणि स्त्री अभ्यास केंद्राच्या विभागप्रमुख प्रा. रत्नमाला बेंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्कार समारंभानंतर बोलतांना कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी म्हणाले की, युवारंग स्पर्धेत विद्यापीठातील विविध प्रशाळा, विशेषतः सामाजिक प्रशाळेने जे यश संपादन केले आहे ते कौतुकास्पद आहे. सुरवातीला मी सर्व गुणवंत विद्यार्थी –शिक्षक यांचे कौतुक करतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपण संपादन केलेले यश निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेबरोबरच जागतिक संभाषणासाठी इंग्रजी भाषाही शिकली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी ज्ञानाबरोबर प्रामाणिकपणा आणि संभाषण कौशल्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवावे तसेच वेळेचे काटेकोर नियोजन करण्याबाबत विद्यार्थ्यांना मौलिक सूचना दिल्या.

यावेळी युवारंग स्पर्धेत यश संपादन करणारे दिशा विनोद ढगे (द्वितीय क्रमांक -शास्त्रीय नृत्य), निकिता भोई  (द्वितीय क्रमांक -मेहंदी), काजल पाटील (द्वितीय क्रमांक –स्पॉट पेंटीग), साराश सोनार, हरिओम पाटील (द्वितीय क्रमांक–वाद-विवाद स्पर्धा), देवांगीनी मोकाशी (तृतीय क्रमांक–शास्त्रीय गायन), संघ व्यवस्थापक-पोर्णिमा लक्ष्मण देशमुख, प्रा. हर्षल हिरामण पाटील, यांचा सुरवातीला कुलगुरू यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील विविध विभागातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यात राज्यशास्त्र व इतर विविध विभागातील पोर्णिमा लक्षमण देशमुख,  योगेश्वर पाटील, अक्षय विजय सपकाळे, बाबासाहेब कैलास जाधव, निलेश सुपडू पाटील, कल्पेश ईश्वर चौधरी, शरद पंडित पाटील, जितेंद्र बापू  पेंढारकर, योगेश आनंदा माळी, शरद राजेंद्र पाटील, जयेश महेश पाटील, अविनाश सोनवणे, अजय सुकलाल कुवर, समाजकार्य विभागातील डॉ. दीपक भिवसन सोनावणे, विशाल सुरेश सपकाळे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातील डॉ. विजय घोरपडे, सारांश सोनार, कैलास पाटील, समाधान वाघ, अर्थशास्त्र विभागातील कोळी निलेश रवींद्र, धनगर अनिल राजू, स्त्री अभ्यास केंद्रातील डॉ. विणा महाजन, प्रा. जितेंद्र पेंढारकर, अनिल राजू धनगर, इतिहास विभागातील प्रा. विश्वास वळवी, प्रा. कुणाल आधार महाजन, प्रा. दीपक पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी चार विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी प्रा. हर्षल मंगला हिरामण यांचे इंग्रजी भाषेत लिखित “डॉ. आंबेडकर यांचे राजकीय विचार आणि निवडणूक अभ्यास” या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा. अजय एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे डॉ. विजय घोरपडे यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उमेश गोगडीया यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content