Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

..तर संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन बोलवा : मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना प्रत्युत्तर

मुंबई प्रतिनिधी | राज्यपालांनी दिलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी पत्रानेच उत्तर दिले आहे. यात महाराष्ट्रापेक्षाही उत्तराखंडात महिलांवरील अत्याचार वाढल्याची आकडेवारी देत तेथेही अधिवेशन बोलवायचे का ? असा सवाल विचारण्यात आला आहे. तर देशभरात महिलांवरील अत्याचार वाढल्याने संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन बोलवण्याची मागणी देखील केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी पत्राच्याच माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यात म्हटले आहे की, . तुम्ही देवभूमीचे सुपुत्र आहात. उत्तराखंडमध्ये महिला अत्याचारांवरील घटनेत दीडशे टक्क्याने वाढ झाली आहे,  हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत. यावर काय उपाय योजना करावी बरे? तेथेही विधिमंडळाचे खास सत्र बोलवू शकतो काय?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

दरम्यान, साकीनाक्यातील घटनेने राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

 

Exit mobile version