Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांनी पेरले तेच उगवले- शालिनीताई पाटलांची कडवट टीका

कोरेगाव प्रतिनिधी । शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून जे पेरले होते तेच आता उगवले असल्याची कडवट टीका शालीनीताई पाटील यांनी केली आहे. आज वसंतदादांच्या आत्म्याला खर्‍या अर्थाने चिरशांती लाभली असेल असेही त्या म्हणाल्या.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या अर्धांगिनी शालिनीताई पाटील या शरद पवार यांच्या प्रखर विरोधक म्हणून ओळखल्या जातात. अलीकडच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी कोरेगाव येथे पत्रकारांशी बोलतांना पहिल्यांदाच भाष्य करतांना शरद पवारांवर जोरदार टीका केली. याप्रसंगी शालिनीताई म्हणाल्या की, देशात विश्‍वासघातकी राजकारणाला शरद पवार यांनीच सुरुवात केली. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले चाललेले सरकार पाडणार्‍या शरद पवार यांना आज पाठीत खंजीर खुपसणे काय असते, हे चांगले कळले असेल आज खर्‍या अर्थाने स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती लाभली आहे. आजवर विश्‍वासघातकी राजकारण करणे हेच पवारांना नडले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीला शरद पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. नियतीचा नियम असून, जे पाप करायचे ते येथेच फेडायचे. शरद पवार यांना या वयात पाप फेडावे लागले आहे, असेही शालिनीताई यांनी सांगितलं. तसेच अजित पवार यांना आपली दुष्यकृत्ये लपवायची असल्याने आणि अनेक प्रकरणांच्या चौकशांच्या ससेमिर्‍यातून सुटण्यासाठी त्यांनी स्वत:च्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

Exit mobile version