मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात गटारी नसल्याने पाणी रस्त्यावर आल्याने साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मुक्ताईनगर नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारी नागरीकांकडून होत आहे.
शहरातील नविन साई मंदिर परिसरात निवृत्ती नगरात गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अशा गटारीचे साचलेल्या पाण्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण निमंत्रणच दिले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांकरिता हिवताप, मेंदुज्वर, मलेरिया, डेन्गु, कोरोना आजारांना निमंत्रण दिसून येतेय. एकीकडे स्वच्छतेचा नारा शासन करते आणि दुसरीकडे नगरपंचायत नागरीकांच्या आरोग्याशी खेळते. रस्त्यावरील साचलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे मुलांचे अपघात, ज्येष्ठ नागरिकांचे अपघात, दुचाकींचे अपघाताला आमंत्रण देणारा हा प्रकार म्हणजे रस्यात खड्डा कि खड्डय़ात रस्ता की पाण्यातला रस्ता अशी अवघड अवस्था या रस्त्याची झालेली आहे.
या परिसरातील नगरसेवक फक्त कागदावरच मूलभूत सुविधांचा अधिकार बजावणार की काय? नगर पंचायत फक्त ही कामे टाळण्यासाठी ‘न’ चा पाढा किती दिवस वाचणार? कर आकारणी अगदी वेळेनुसार, वसुली सुध्दा घरी जावून मात्र नागरिकांसाठी च्या मूलभूत सुविधा…….? रस्ते, गटर, पिण्याचे शुद्ध पाणी नाही,रिकाम्या प्लॉट मध्ये पाण्याचा साठा जो आजारांना निमंत्रण देतोय त्याचेकडे मुद्दाम न दिसल्याचा बनाव करते आहे. रस्ते पाण्याने खच्चून भरले. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारा हा रस्ता, सांडपाण्याची नियोजन शून्यता नागरिकांच्या आरोग्यासाठी जीवघेणी ठरते आहे.. तरी नागरिकांसाठी जिवघेण्या ठरलेल्या रस्ता व सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची तातडीने व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.