संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान !

शेगाव, अमोल सराफ | यंदाच्या आषाढी एकादशीसाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी अतिशय चैतन्यदायी वातावरणात पंढरपुरकडे प्रस्थान झाले.

यंदाच्या आषाढी वारीसाठी गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जूनला प्रस्थान झाले आज सकाळी साडे सात वाजता श्रींच्या पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली . पालखीचे हे ५३ वे वर्ष असून पालखीत शेगाव येथून ७०० भाविक सामील झाले आहेत. पालखी सकाळी ७ वाजता मंदिरातून प्रस्थान झाली. त्यानंतर पालखीचा मार्ग दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथे असणार आहे. तर रात्री पालखीचा मुक्काम पारस येथे असणार आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजेच ७ जूनला दुपारी गायगांव येथे पालखी प्रस्थान करणार आहे. तर रात्री भौरद येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. यानंतर पालखी विविध ठिकाणी मुक्काम करून पंढरपूर येथे पोहचणार आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्ष वारकर्‍यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. गावागावांत वारकर्‍यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता सर्व वारकर्‍यांना पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे.

Protected Content