Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाचन संस्कृती टिकली पाहिजे – अजित पवार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| अलीकडे डिजिटल क्रांतीमुळे वाचन संस्कृती बदलली आहे. मात्र वाचन संस्कृती टिकली पाहिजे. कारण त्याची गरज आहे, असे विचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 97व्या साहित्य संमेलनाला डिजिटल टच देण्यात आला आहे. ‌‘चॅटबॉट’सारख्या तंत्रनाचा वापर यात खुबीने करण्यात आला आहे, अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कौतुकदेखील केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत होत असलेल्या साहित्य संमेलनाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. साने गुरुजी अमळनेर येथील ज्या तत्त्वज्ञान केंद्रात शिकले, असे तत्त्वज्ञान केंद्र राज्यात क्वचितच दिसेल. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा यांचे काम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडायचे आहे.

साने गुरुजींचे स्मारक उभारणार
साने गुरुजींचे अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात वास्तव्य होते. येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे ना.अजित पवार यांनी सांगितले. साने गुरुजींच्या नावाला साजेसे असे स्मारक व्हावे, यासाठी राज्य सरकार निधी देईल, असेही ते म्हणाले. यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनादेखील त्यांनी केल्या.

Exit mobile version