मतदानापासून वंचीत ठेवण्यासाठी अटकेचा प्रयत्न : रवी राणा

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपण भाजपला मतदान करू नये यासाठी राज्य सरकार आपल्याला अटक करण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी एकेक मत महत्वाचे असतांना आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सरकारवर आरोप केला आहे. रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा हा भाजपच्या समर्थक असून अलीकडच्या काळात त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात मोर्चा उघडलेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता राणा यांचे मत हे भाजपला असेल हे स्पष्ट असतांना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे.

आमदार रवी राणा यांनी रविवारी एक व्हिडीओ जारी केला आहे. यात म्हटले आहे की, राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत असे रवी राणा यांनी म्हटले आहे.

Protected Content