Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पातोंडा-नांद्री येथे विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा नांद्री येथे शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले.
पातोंडा नांद्री येथे सकाळी दहाच्या सुमारास भारत राष्ट्र समितीचे अमळनेर विधानसभा क्षेत्र समनव्ययक शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन पुकारले होते.त्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी वर्ग व वाहनांना तासभर ताटकळत बसावे लागले होते.आंदोलकांच्या मागणीनुसार एका तासानंतर तहसीलदार प्रदिप सुराणा दाखल झाल्यावर शेतकर्‍यांनी निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.

या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश होता. या प्रामुख्याने शेतकर्‍यांना सन २०२१ चे अतिवृष्टीचे ५४ कोटी रुपयांचे अनुदान त्वरित देण्यात यावे,सन २०२३ चा खरीप पिकांचा पीक विम्याची थकीत ७५ टक्के रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी,अमळनेर तालुका दुष्काळ घोषित करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देणे,रब्बी हंगामात झालेल्या गारपिट नुकसान भरपाई त्वरित देणे,शेतकर्‍यांचे पीक कर्जे सरसकट माफ करणे,शेतकर्‍यांना पी.एम.किसानचा निधी न मिळणे आदी मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते.
तालुक्याच्या मंत्र्यांनी बारामती, चाळीसगाव आदी तालुक्यांत दुष्काळ नसताना देखील दुष्काळ घोषित करून निधी उपलब्ध करून दिला मात्र भूमिपुत्र म्हणणार्‍यानी अमळनेर तालुका दुष्काळ असताना देखील मात्र अमळनेर तालुक्याकडे पाठ फिरवली अशी बोचरी टीका शेतकर्‍यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर केली.मदत व पुनर्वसन मंत्री असूनही भूमिपुत्र आमदार अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घेत नसल्याची खंतही आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी केली.जोपर्यंत प्रांताधिकारी व तहसीलदार आंदोलन स्थळी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुटणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतल्याने तासाभरानंतर तहसीलदार प्रदिप सुराणा दाखल झाले.

यानंतर, शेतकरी नेते शिवाजी पाटील,दिलीप पाटील,प्रकाश लांबोळे,संजय पवार आदींनी आपल्या मागण्या व शेतकर्‍यांच्या व्यथा तहसीलदार समोर मांडल्या.तुमच्या मागण्या व व्यथा प्रशासनाच्या वतीने शासनाकडे मांडून न्याय मिळवून देणार असे आश्वासन उपस्थित शेतकर्‍यांना तहसीलदार यांनी केल्यानंतर शेतकर्‍यांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. यावेळी अमळनेर पोलिसांनी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Exit mobile version