Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरेंची अवस्था रिटायर्ड कॉमेंट्रीटर खेळाडूसारखी-मुख्यमंत्री

Raj Thackeray Devendra Fadnavis

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातीतील मुलाबाबतची दुसरी बाजू मांडली आहे. राज ठाकरे चार वर्षांपूर्वी कधी हरिसालला गेले होते का ? आम्ही त्या मुलाला मॉडेल म्हणून घेतलं नाही. गावातील त्या मुलानेच तिथे गेलेल्या टीमला स्वत: गाव दाखवलं. गावात काय काय बदल झाले, परिवर्तन झालं हे त्या मुलानेच त्या टीमला दाखवलं. मी त्याचे व्हीडिओही तुम्हाला देऊ शकतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या सोलापूरच्या सभेतील मुद्दा खोडून काढला आहे.

 

राज ठाकरेंची दुकानदारी बंद पडल्याने ते फ्रस्टेशन काढत आहेत. राज ठाकरेंची अवस्था ही क्रिकेटमधील रिटायर्ड कॉमेंट्रीटर खेळाडूसारखी आहे. त्यामुळेच भाजपा आणि मोदींना ते लक्ष्य करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच हरिसालविषयी बोलताना, चार वर्षांपूर्वीच हरिसाल वेगळं होतं आणि आज पाहाल तर हरिसाल वेगळं आहे. हरिसालमध्ये कुठलेही फोर-जी टॉवर बसविण्यात आलेले नाही. ते गाव डिजीटल करण्यासाठी एक वेगळीच तंत्रप्रणाली वापरण्यात आली आहे.

व्हाईटस्पेस नावाची नवीन टेक्नॉलॉजी पावरण्यात आली आहे. टीव्हीच्या लहरींप्रमाणे स्पेक्ट्रमच्या माध्यमातून तेथे इंटरनेट सेवा पुरविण्यात आली असून त्याप्रमाणे हे गाव डिजीटल बनविण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या बाबी माहिती नसून केवळ मुंबईतील दादरला बसून हरिसाल समजत नसतं, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच गावातील त्या मुलासंदर्भात बोलायचं झाल्यास, हे सांगतात हा मुलगा पुण्यात सापडला. आता, राजकारण करायचं म्हटल्यावर हे शक्य आहे. आणि गावाकडचा एखादा मुलागा नोकरीसाठी पुणे, मुंबईकडे येत असेल तर त्यात गैर काय ? असे फडणवीस यांनी म्हटलं आहे. गावात किमान वेतनाची काम आम्ही देत आहोत. पण, त्या गावात इंडस्ट्री तर उभी करू शकत नाही, निदान हे तरी समजायला हवं. केवळ, फ्रस्टेशन काढण्यासाठी राज ठाकरेंकडून ही दिशाभूल होत आहे. त्यामुळे, राज ठाकरेंना आम्ही महत्व देत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांना हरिसालबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी हरिसाल हे डिजिटल व्हिलेज असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. राज ठाकरे हरिसालला गेलेलेच नाहीत. तुम्ही तुमच्या लोकांना पाठवून तिथली परिस्थिती बघा, असंही फडणवीस म्हणाले. मात्र त्या वृत्तवाहिनीलादेखील हरिसालमध्ये काहीच डिजिटल दिसलं नाही. यावरुनही राज यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. ‘राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात 2 लाख वीस हजार विहिरी बांधल्या. कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात?’, असा सवाल राज यांनी विचारला.

Exit mobile version