Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरेंनी सरकारचे पूरोगामित्व काढले !

 

मुंबई,वृत्तसंस्था ।  राज्यातील जनजीवन सुरळीत होत असताना अजूनही मंदिरं उघडली जात नसल्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असा सवाल करतानाच सर्वात शेवटी मंदिरं उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. मंदिरं उघडण्याचा लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा इशारा दिला आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरू असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?, असा सवाल करतानाच ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

Exit mobile version