Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसेच्या पोपटाला बारामतीकडून मिळालीय सुपारी- मुख्यमंत्री

wp 1532365005044.

मुंबई (वृत्तसंस्था)। मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना, राज ठाकरेंची स्क्रीप्ट हल्ली बारामतीमधून येते. त्यांनी सुपारी घेतली आहे, ते तसेच बोलणार असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई भाजपच्या महिला मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली. बारामतीला पोपटाची कमी पडली की, ते नवीन शोधून काढतात. त्यांना जे बोलता येत नाही, ते या पोपटाच्या तोंडून बोलतात. ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एक आमदार निवडून आणता येत नाही, एक खासदार निवडून आणता येत नाही. एखाद्या टीममध्ये नॉन प्लेईंग कॅप्टन असतो. हे नॉन प्लेईंग कॅप्टनही नाही अन् बारावा गडीही नाही. त्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतलीय, त्या सुपारीनुरुप ते भाषणं करत राहतील. पण, त्यांच्या भाषणाने कुणीही विचलीत होणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. मोदीजी सुर्यासारखे असून त्यांच्यावर थुंकणाऱ्याच्याच अंगावर ती थुंकी पडते. मोदींच्या नेतृत्वात चार वर्षात मुंबई सुधारतेय, मुंबईतील गरीब, झोपडपट्टीतील माणसाचाही विकास होत आहे. आज प्रत्येक गरीबाला घराची चावी देण्याचं काम होतंय. संपूर्ण महाराष्ट्र बदलतोय, भारत बदलतोय हे आपण लक्षात ठेवायला हवं. भाजपा महाराष्ट्रात ४५ जागा जिंकून दाखवले, असा आत्मविश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवला. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजपवर जहरी टीका केली होती.

Exit mobile version