यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील किनगाव जवळच्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळा सुरू झाल्याने चिखलासह मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या पुलाची दुरूस्ती होणे आवश्यक असल्याची नागरिकांची मागणी आहे.
तालुक्याला गुजरात आणि मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गालगत किनगाव गावाजवळ असलेल्या लेंडी व लव्हाळ या एकत्र आलेल्या नाल्यावरील पुलावर मातीसह कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने पुलावर दिवसेंदिवस वजन वाढत आहे.
पुलाच्या बाजुला कठड्यांनखाली पुलावरून पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेले पाईपांचे छिद्रे या मातीमुळे पुर्णपणे बंद झाले असल्याने त्यामुळे मार्गावरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला असून या चिखलावरून एखादे वाहन स्लीप झाले तर ५० ते ६० फुट खोलवर असलेल्या नाल्यात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाच्या यावल व चोपडाकडे जाण्या-या दोघेही बाजूच्या काही अंतराच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्यांनमुळे किरकोळ अपघातही झालेले आहेत.
मात्र यावलचे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नेहमीच वाहनाच्या वर्दळीच्या या पुलाच्या वजनाबरोबरच चिखल व साचणाऱ्या पाण्याचे वजन या पुलावर झाल्याने या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गाने दररोज हजारो वाहनांचा वापर या पुलावरून असल्याने नियमीत या पुलाच्या देखभालीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या दुरूस्तीकडे लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस या पुलावर मातीमुळे वजन वाढत आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने या पुलावर चिखलासह मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुक असल्याने या पुलाची दुरूस्ती होणे आवश्यक आहे.