भुसावळ (प्रतिनिधी) मुलाच्या नावाने घेतलेल्या चिल्ड्रेन मनी बॅक पॉलिसीचा मासिक हप्ता वारंवार प्रयत्न करूनही थेट बँक खात्यातून वर्ग होत नाही उलट दरवेळी हप्ता भरायला उशीर होवून दंड भरावा लागतो. याबाबत संबंधितांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे येत्या १० दिवसात जर ही सुविधा पूर्ण झाली नाही, तर भुसावळ येथील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा येथील डॉ.नि.तु. पाटील यांनी शाखा व्यवस्थापकांना एका पत्राद्वारे दिला आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मुलगा वेदांत निलेश पाटील याच्या नावाने त्यांनी ही पॉलिसी २०१६ साली घेतली होती. पॉलिसी क्र.९६५५२६६८९ असा असून सदर पॉलिसी १० लाखांची आहे. दि.१९/१०/२०१६ ही पॉलिसी सुरु आहे. सदर पॉलिसी ही NATCH अंतर्गत दर महिना हप्ते भरण्याची आहे, त्यासाठी सुरवातीला हप्ता रु.३९७२/- (क्र.३६८४) भरून पुढील हप्ते हे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भुसावळ येथील खात्यातून वर्ग होणार होते. त्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण केले, पण आजतागायत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
नंतर LIC कडून बँक बदला असे सांगण्यात आले, मग AXIS बँकेकडे सर्व प्रक्रिया केली गेली, तरी पण तोचअनुभव आला. दर वेळेस आता हप्ता भर पुढच्या वेळेस सुविधा सुरु होईल असे सांगत-सांगत आता २०१९ साल उजाडले पण सुविधा सुरु झालीच नाही. यासाठी मी वेळोवेळी पत्रव्यवहार केला,TWITTER वर संपर्क केला तसेच विमा प्रतिनिधी शंकर झोपे यांनीही पत्र व्यवहार केला पण काहीही उपयोग झाला नाही.
यासर्व पार्श्वभूमीवर जर येत्या १० दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास भुसावळ येथील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा डॉ. पटोल यांनी दिला आहे. या पत्राच्या प्रती त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, बाजारपेठ पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक आणि आयुर्विमा महामंडळाचे नाशिक येथील मुख्य व्यवस्थापक यांना पाठवल्या आहेत.