पराभव म्हणजेच पवारांना धक्का : म्हणून खडसेंना जिंकवण्यासाठी राष्ट्रवादीची रणनिती !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधानपरिषदेत पराभूत करण्यासाठी त्यांच्या सर्व विरोधकांची मोर्चेबांधणी दृश्यमान झाली असतांनाच राष्ट्रवादीला हा पराभव परवडणार नसल्याने त्यांना काहीही करून जिंकवण्यासाठी रणनिती आखण्यात आली आहे. जाणून घ्या आमचा स्पेशल रिपोर्ट !

एकनाथराव खडसे यांनी विरोधात आणि नंतर सत्तेत असतांना अनेक मातब्बर नेत्यांना अंगावर घेतले, त्यांना बर्‍याच ठिकाणी दुखावले. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने खडसेंना तिकिट नाकारून त्यांच्या मुलीस तिकिट दिले तरी पडद्याआड बर्‍याच घटना घडल्या. रोहिणी खडसे अल्पमतांनी पडल्या. आणि त्यांच्या पराभवात खडसेंच्या सर्व विरोधकांची एकत्रीत ताकद कारणीभूत असल्याचा स्पष्ट झाले होते. एकनाथराव खडसे यांनी स्वत: यासाठी भाजपमधीलच नेत्यांवर थेट आरोप करून त्यांनी चंद्रकांत पाटलांना रसद पुरविल्याचा जाहीर आरोप केला होता. मात्र सर्व विरोधकांनी विधानसभेत नाथाभाऊंच्या मुलीस पराभूत करण्यासाठी हातभार लावल्याची बाब आता जवळपास स्पष्ट झाली आहे. आता हाच चमत्कार विधानपरिषदेत करण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. तथापि, २०१९ आणि २०२२ मध्ये बराच फरक असल्याची बाब आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे.

२०१९ सालच्या निवडणुकीत भाजपचे श्रेष्ठीच नाथाभाऊंवर नाराज असल्याने त्यांना तिकिट नाकारून त्यांच्या मुलीला देण्यात आले. तर, खडसे यांच्यासारखा मोहरा गळाला लागल्याने त्यांना तात्काळ विधानपरिषदेत पाठविण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचे नाव दिले. दुर्दैवाने हा निर्णय रखडल्यामुळे आता होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. खडसे यांच्यामुळे विधानपरिषदेत राष्ट्रवादीला बळकटी मिळणार असून प्रवीण दरेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांचा हल्ला परतून लावण्यासाठी खडसे यांचा उपयोग होणार आहे. तर सभागृहाच्या बाहेर देखील ते पक्षाचा भक्कम बचाव करू शकतात. याचा विचार करता खडसे यांना काहीही करून विधानपरिषदेत पाठवण्याचा चंग राष्ट्रवादीने बांधल्याचे त्यांना लागोपाठच्या दुसर्‍या संधीवरून दिसून आले आहे.

यातील दुसरा आयाम हा प्रतिष्ठेचा आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसल्याने मविआ डळमळीत झाल्याचा संदेश गेला आहे. आता सुध्दा भाजपने मविआचा आणि विशेष करून राष्ट्रवादीचा उमेदवार पाडला तरह ा पक्ष आणि अर्थातच, शरद पवार यांना हा मोठा धक्का बसेल. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्या टप्प्यातच विहीत मते टाकून एकनाथराव खडसे यांना टाकून त्यांना निवडून आणण्याची शक्यता आहे. तर यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांना निवडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळेच एकनाथराव खडसे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content