जळगाव (प्रतिनिधी) खूप चांगली कामे केली आहेत आणि लोक निवडून देतील असं वाटत असेल तर खासदार ए. टी. पाटील यांनी निवडणूक लढवूनच दाखवावी, असं खुलं आव्हान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिले. भाजपच्या बैठकीसाठी गिरिश महाजन आज जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘आपण खूप मोठे काम केले आहे किंवा लोक निवडून देतील, असे ए. टी. पाटील यांना वाटत असेल तर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी आणि अनामत रक्कम वाचवावी, असं आव्हान त्यांनी यावेळी दिले. त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यांना मी निवडणूक लढवण्याचं खुलं आव्हान देत आहे. धुळ्यात अनिल गोटे यांनाही मी आव्हान दिलं होतं. अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्याशी बोलणे झाले आहे. ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले.
गावितांबाबत सूचक विधान- नंदुरबार येथील माजी खासदार माणिकराव गावित यांच्या मुलाच्या भाजप प्रवेशाबद्द्ल विचारले असता, आता मला काही माहीत नाही. वाट बघा, असं सूचक वक्तव्यही महाजन यांनी केलं.
शिवसेनेची मागणी मान्य होणे अवघड-शिवसेनेला स्थानिक पातळीवर सत्तेत सामावून घेण्यासाठीच्या मागणीबद्दल चर्चा होईल. महापालिका आणि जिल्हा परिषदेत आम्ही स्पष्ट बहुमतात आहोत. त्यामुळे तेथे शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेणे अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात काही ठिकाणी भाजप; तर काही ठिकाणी शिवसेना स्थानिक पातळीवर स्पष्ट बहुमतात आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत, असेही महाजन म्हणाले.