जात पडताळणी समित्यांच्या गैरकारभारावर आ. किशोर पाटलांची लक्षवेधी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जात पडताळणी समित्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत असल्याने या समित्याच रद्द करण्यात याव्यात अशी मागणी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जात पडताळणी करतांना अनेकांना खूप अडचणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली.

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणार्‍या जात पडताळणी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय, जात वैधता प्रमाणपत्र देत नाहीत. अर्ज दाखल केल्यापासून केवळ ९० दिवसात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक असूनही, समितीचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी कामद्याला जुमानत नसल्याचे आमदार किशोर पाटील म्हणाले.

या अनुषंगाने राज्यातून जात पडताळणी समित्या हद्दपार कराव्या, अशी मागणी त्यांनी केली. देशात महाराष्ट्र,पंजाब तामिळनाडू व हरीयाणा या चारच राज्यात जात पडताळणी समित्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून देखील ही समिती रद्द करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी याप्रसंगी केली.

Protected Content