नुकसान भरपाईसाठी आ. किशोर पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पाचोरा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी व नागरिकांना तातडीने भरपाई मिळावी या मागणीसाठी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या अतिष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कोकण धर्तीवर शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आ. किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मदतीसाठी साकडे घातले. मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत आधीच कोरोनामुळे हवालदिल झालेल्या जनतेला यातून दिलासा देण्यासाठी शासनामार्फत भरघोस मदत देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे सविस्तरपणे एकूण घेत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

नुकत्याच पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील भिलदरी येथील प्रकल्प फुटल्याने तितुर आणि गढद नदीला महापुर येवुन पाचोरा तालुक्यातील ११ तर भडगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यात सुमारे ६० घरांची पडझड झाली असून अनेक घरांचे लहानमोठे नुकसान झोले आहे. तर सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेल्याने शेतकर्‍यांच्या हाती तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे.

पाचोरा तालुक्यातील सावखेडा खु गावाचा संपर्क तुटला होता. तसेच नगरदेवळा, कजगाव येथील पुलही वाहुन गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे याशिवाय अनेक गावात इलेक्ट्रीक तारा तुटुन व विजेचे खांब पडल्याने काही गावांचा विज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आ. किशोर पाटील यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर केला होता.

Protected Content