राणे यांच्या मारेकर्‍यांना अटक करा : धनगर समाज आक्रमक

पाचोरा प्रतिनिधी । वायरमन गजानन राणे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्यांना तातडीने अटक करण्यात यावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील सकल धनगर समाजाने दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेने पाचोरा व भडगाव तालुक्यात दि. ७ जून रोजी ताला ठोक आंदोलन केले. त्यावेळी भडगाव येथील महावितरण कार्यालयात काही संशयित राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोड करत अभियंता अजय धामोरे यांच्यासह उपस्थित कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आली. त्यात वायरमन गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु घटना घडून तीन दिवस झाले तरीही गुन्हेगारांना अजून पर्यंत अटक झालेली नाही.

या घटनेच्या निषेदार्थ पाचोरा तालुक्यातील सकल धनगर समाजाने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे पाटील तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता श्याम दासकर यांना निषेध निवेदन देऊन गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. तसेच लवकरात लवकर अटक न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आला.

या प्रसंगी समाज बांधवांना विचारणा केली असता धामोरे धनगर समाजातील युवकांसाठी आदर्श असून शासनाच्या महावितरण कंपनीत ते निष्ठेने आपली सेवा बजावत असतांना आमचे समाज बांधव अजय धामोरे व इतर कर्मचारी यांना मारहाण करण्यात आली व ते थोडक्यात बचावले. तसेच त्यात एका कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला तरी आंदोलकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक पद्धतीने आंदोलन न करता नियोजित कट रचून अशा असंविधानिक पद्धतीने मोठ्या संख्येने महावितरण कार्यालय जबरदस्ती घुसून तोडफोड करून अजय धामोरे यांच्यासह कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला केला तरी या गुन्हेगारी प्रवृत्तीतील संशयित राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा महाराष्ट्रातील संपूर्ण सकल धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करतील असा इशारा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिला.

Protected Content