Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘निर्भया’च्या आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळली : फाशी कायम

hanging rope

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | निर्भया प्रकरणातील एका आरोपीच्या पुनर्विचार याचिकेवर आज (दि.१८) सुनावणी करण्यात आली. यावेळी पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आरोपीच्या वकीलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी तिहार तुरूंगाचे तुरूंग अधीक्षक सुनील गुप्ता यांच्या पुस्तकाचा उल्लेखही करण्यात आला. त्याच्या वकीलांनी पुस्तकाचा उल्लेख करत एका आरोपच्या आत्महत्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी न्यायालयानेही यावर प्रतिक्रिया देत ट्रायल पूर्ण झाल्यानंतर यावर पुस्तक लिहिणे हा गंभीर ट्रेंड असल्याचे म्हटले. दरम्यान, आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

 

युक्तीवादादरम्यान आरोपीच्या वकीलांनी टेस्ट इन परेडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. दरम्यान, न्यायमूर्ती भानुमती यांनी हा मुद्दा ट्रायलदरम्यानही विचारात घेतला होता का ? असा प्रश्न विचारला. यावेळी आरोपीच्या वकीलांनी हा नवा मुद्दा असल्याचे न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तीवादासाठी अर्ध्या-अर्ध्या तासाची वेळ दिली होती. देशामध्ये अनेक लोकांच्या फाशीच्या शिक्षा प्रलंबित आहे. अशात दया याचिकेसाठी अर्ज केल्यानंतरही फाशीच्या शिक्षेसाठी घाई का केली जात आहे ?, असा सवाल आरोपीच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला. तसेच या प्रकरणातील मुख्य साक्षीदारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत याप्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावेही विश्वास ठेवण्यासारखे नसल्याचे त्यांनी म्हटले.

मी गरीब आहे म्हणून मला फाशीची शिक्षा दिली जात आहे, असे दोषीने आपल्या वकीलांमार्फत न्यायालयाला सांगितले. तसेच सर्व राजकीय अजेंड्यानुसार होत असल्याचेही वकीलांकडून सांगण्यात आले. युक्तीवादादरम्यान आरोपीच्या वकीलांनी वेद, पुराण आणि त्रेता युगाचा उल्लेख केला आणि कलियुगात लोक केवळ ६० वर्ष जगतात परंतु अन्य युगांमध्ये लोक जास्त जगतात, असेही म्हटले. दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरोपींची पुनर्विचार याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिकाही रद्द केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोणताही उशिर न करता या प्रकरणाचा निकाल दिला पाहिजे. आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी मागणीही मेहता यांनी न्यायालयाकडे केली.

Exit mobile version