Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावणाचाही अहंकार टिकला नाही, मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे : राणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रावणाचाही अहंकार टिकला नाही, मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे अशा शब्दांमध्ये आमदार रवी राणा यांनी आज टिकास्त्र सोडले. तर संजय राऊत हे चवन्नीछाप असल्याचा टोलादेखील त्यांनी मारला.

आमदार रवी राणा यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका केली. यात त्यांनी खासदार संजय राऊत यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, पोलीस आम्हला नेत असतांना. शिवसैनिकांनी आमच्यावर दगड, पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्याच्यावर कारवाई केली नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चहा पाजला. त्यानंतर रात्री सांताक्रूझला लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला पाणीसुद्धा दिले नाही. उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई केली.

आमच्यावरील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप आहेत. संजय राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात. आम्हाला २० फूट खोल गाडण्याची धमकी देतात. संजय राऊतांवर महाराष्ट्रावर गुन्हा दाखल होत नाही. पण हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे राणा म्हणाले.
आमदार राणा पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांमध्ये अशा प्रकारचा अहंकार असेल तर एक लक्षात ठेवा रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही. रामाने त्याचा सर्वनाश केला. अहंकारने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल, असेही रवि राणा म्हणाले.

Exit mobile version