Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकशाहीदिनी जिल्हाभरातून 56 अर्ज दाखल

lokshahi din

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या लोकशाही दिनात जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 56 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसूल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व बालकल्याण विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.

या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख एस.पी.घोंगडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) बी. ए. बोटे, तहसिलदार मंदार कुलकर्णी, गृह शाखेचे नायब तहसिलदार रविन्द्र मोरे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेवून सर्व तक्रारी अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. जेणेकरुन तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याच्या सूचनाही उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. त्याचप्रमाणे नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत असे आवाहन उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी केले आहे.

Exit mobile version