नवी दिल्ली, वृत्तसंस्था | दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानकडे दहशतवाद हे एकमेव शस्त्र आहे. पण पाकिस्तानचे मनसुबे आम्ही उधळून लावू, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ठणकावून सांगितले आहे.
केंद्राने घेतलेल्या निर्णयाला काश्मीरमधील नागरिकांचा पाठिंबा आहे. आगामी काळात राज्यात नव्या संधी निर्माण होतील. कलम ३७० हे काश्मीरसाठी विशेष दर्जा नव्हते तर तो भेदभाव होता, असेही डोवल यांनी सांगितले. दहशतवादाच्या मुद्द्यावरून त्यांनी पाकिस्तानला इशाराही दिला. काश्मीरमध्ये शांतता आहे. तेथील परिस्थिती सामान्य आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांचे पाकिस्तानचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांचे निर्देश दिले गेले आहेत. सीमेपासून २० किलोमीटरवर पाकिस्तानचे कम्युनिकेशन टॉवर आहेत. त्यांच्या संवादातून महत्वाची माहिती मिळाली आहे,’ असेही डोवल यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये २३० दहशतवादी सक्रिय आहेत. त्यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.