पाचोरा व भडगावातील शेतकऱ्यांची खरीप हंगाम पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा व भडगाव तालुक्यातील ‘पिक विमा योजना खरीप हंगाम – २०२१’ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.

पाचोरा तालुक्यातील ६८८ शेतकऱ्यांसाठी ८० लाख ७४ हजार ९६५ रुपये व भडगाव तालुक्यातील ८३ शेतकऱ्यांना ४ लाख ५३ हजार ३३३ रुपये अशी एकूण ८५ लाख २८ हजार २९८ रुपये जमा झाली असून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. खा.उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेला पाठपुरावा व प्रयत्नांना प्रत्यक्षात यश आले असून त्यासंदर्भात दि.३० सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव व प्रांताधिकारी पाचोरा आणि तहसीलदार पाचोरा यांच्याकडे अमोल शिंदे यांनी पत्राद्वारे मागणी लावून धरली होती.

“पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाचा खंड व नंतर झालेल्या अति मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बांधव पूर्णपणे हवालदिल झाले होते. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना या सरकारने वार्‍यावर सोडले त्यांना दिवाळीआधी खात्यावर दुष्काळी मदत जाहीर करायचे घोषित करून दिवाळीनंतर तुटपुंज्या पद्धतीची मदत करत त्यांची दिवाळी काळी करून शेतकऱ्यांची थट्टा केली.” असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. तसेच सदर नुकसानीची भरपाई रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामान परिस्थिती या दोन प्रकारे कापूस, उडीद, मूग, सोयाबीन यासाठी मंजूर करून देण्यात आलेली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सदर नुकसानभरपाईची रक्कम मिळवून दिल्याबद्दल पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खा. उन्मेष पाटील व अमोल शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

Protected Content