कंगनाचे ग्रामपंचायत निवडणुकीतही डिपॉजीट जप्त होईल- बच्चू कडू

अमरावती । अभिनेत्री कंगना राणावत हिला इतके महत्व देण्याची गरज नसून तिला ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले तर तिचे डिपॉजीट जप्त होईल अश शब्दात राज्य मंत्री बच्चू कडू यांनी तिची खिल्ली उडविली आहे.

राज्यात सध्या अभिनेत्री कंगना राणावत व सत्ताधार्‍यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यातही कंगनाने प्रामुख्याने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. या पार्श्‍वभूमिवर, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कंगनाची जोरदार खिल्ली उडवली आहे. कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही. एवढचं नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात भाजपच्या भूमिकेवरूनही बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले आहे. एखाद्या अभिनेत्रीमागून भाजपा घाणेरडे राजकारण करत आहे हे चुकीचं आहे. कंगनाला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी कंगना आणि भाजपाला टोले मारले आहेत. राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्‍न नाही, कारण शिवसेनेचा वाघ तिथं बसलाय असं त्यांनी म्हटलं आहे.

Protected Content