Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादाची ठिणगी : कंडारीत दोन सख्ख्या भावांचा करूण अंत !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराच्या नजीकच असलेल्या कंडारी गावातील दोन कुटुंबांमधील असलेल्या वादातून दोन सख्ख्या भावंडांचा करूण अंत झाल्याने परिसर हळहळला आहे.

भुसावळ आणि कंडारी या दोन्ही ठिकाणी काल रात्री एकूण तीन खून झाल्याने येथील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यातील कंडारी येथील खुनांना जुन्या वादाची किनार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, कंडारी गावातील शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एक परीवाराशी जुना वाद होता. यातून त्यांच्यावर काल रात्री अकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला.

यात हल्लेखोरांनी साळुंखे बंधूंवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झाली तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळताच भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तात्काळ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. दरम्यान, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Exit mobile version