Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमेरिकेत नोकरीच्या नावे फसवणूक : १४५ तरुणांना हात-पाय बांधून पाठवले

youth tied by rope

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | ते उच्च शिक्षित होते.. अमेरिकेत जाऊन चांगली प्रतिष्ठित नोकरी करणे हे त्यांचे स्वप्न होते. ते तिथे पोहोचलेही. यासाठी त्यांनी एजंटला २५-२५ लाख रुपये दिले. काहींनी काम करायला सुरुवातही केली. पण त्यांना कुठे ठाऊक होते की त्यांच्या या सुंदर स्वप्नाचा लवकरच चुराडा होणार आहे.. अवैध पद्धतीने अमेरिकेत घुसण्याचा आरोप ठेवत त्यांना तेथे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांना अवैध प्रवासाच्या गुन्ह्याखाली तेथील डिटेंशन सेंटरमध्ये कैद करण्यात आहे. खूप मजल दरमजल करत या तरुणांनी अखेर बुधवारी भारतात पाऊल ठेवले.

 

बुधवारी सकाळी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते सर्व उतरले. पण त्यांचे हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते. विमानातून उतरण्याआधी त्यांचे हात-पाय मोकळे सोडण्यात आले. स्वप्नाचा पाठपुरावा करताना त्यांच्यावर अशी लाजिरवाणी वेळ आली. पण मायभूमीचा स्पर्श झाला आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही कहाणी त्या १४५ भारतीयांची आहे ज्यांना अमेरिकेत अवैध रीतीने गेल्याच्या आरोपावरून भारतात परत पाठवण्यात आले.
२१ वर्षीय सुखविंदर सिंहने एक वर्षानंतर मोबाईल हातात घेतला आहे. आपल्या वडिलांना तो कळवत होता की पुढच्या सहा तासांत तो घरी असेल, पण त्यावेळी त्याला हुंदके आवरत नव्हते. वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी विचारले की अमेरिकेत सर्वकाही ठीक होते ना? सुखविंदरला हरयाणातील आपल्या कुटुंबाला सत्य परिस्थिती सांगायला लाज वाटत होती.

हे १४५ भारतीय दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले त्यावेळी त्यांची अवस्था वाईट होती. ते थकलेले दिसत होते. काहींचे फाटलेले कपडे, लेस नसलेले बूट अशा अवस्थेत ते बाहेर आले. त्यांच्यामध्ये तीन महिला देखील होत्या. त्यांना अमेरिकेच्या एरिझोना येथून डिपोर्ट केले गेले होते. त्यांच्यासोबत २५ बांगलादेशी देखील होते. त्यामुळे या भारतीयांना घेऊन येणारे चार्टर्ड प्लेन थोडा वेळ ढाका येथेही थांबले होते. यातले काही कुशल इंजिनीअर होते, पण त्यांच्याकडे नोकरी नव्हती. त्यांनी अमेरिकेतल्या नोकरीच्या मोहापायी एजंटांना २५-२५ लाख रुपये दिले होते. पण गेली पाच महिने ते तिथे डिटेंशन सेंटरमध्ये कैदेत होते. यापैकी काही जणांनी तर वर्षभरापूर्वी घर सोडले होते.

Exit mobile version