मारहाणीत युवकाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्याची मागणी

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील डोहरीतांडा येथील युवकाचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी बंजारा समाजबांधवांतर्फे करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथील ज्ञानेश्‍वर प्रताप तंवर (वय २८) हा युवक १७ मे रोजी घाणेगांवकडे जात होता. वाकडी येथे रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने त्याची दुचाकी अनियंत्रित झाली व महिलेला धक्का लागला. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी लाठ्या-काठ्यांनी युवकाला मारहाण केली होती. जखमी ज्ञानेश्‍वरचा उपचारादरम्यान १८ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची कसून चौकशी करत दोषींवर कलम ३०२ नुसार कारवाई करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षीय बंजारा समाजाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण, राजू नाईक, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नीलेश चव्हाण, रमेश नाईक, डॉ.ऐश्‍वर्या राठोड, किशोर नाईक, काँग्रेसचे मुलचंद नाईक आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Protected Content