विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

जळगाव प्रतिनिधी । जळगावसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटे विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे.

हवामान खात्याने आधीच ३१ मे पर्यंत जळगाव जिल्ह्यातील बर्‍याच भागात वादळी वार्‍यासह जोरदार जलधारा कोसळणार असल्याचा इशारा दिला होता. दोन दिवसांपासून रावेर, मुक्ताईनगर आदी तालुक्यांमध्ये मान्सूनपुर्व वादळी पावसाने हजेरी लावली असून येथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. कालच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या नुकसानीची पहाणी केली.

दरम्यान, आज पहाटे जळगाव शहरात देखील वादळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यांनी युक्त असणार्‍या जलधारा परिसरात कोसळल्या. यात शहराच्या बर्‍याच भागातील वीज पुरवठा खंडित झाला. बर्‍याच वेळानंतर सकाळी काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला असला तरी अजूनही काही भागात वीज बंद असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ढगाळ वातावरण दिसून आले आहे.

Protected Content