तूर उत्पादकांना अनुदानावर फवारणी निविष्ठा उपलब्ध करून द्या : खा. उन्मेष पाटील

जळगाव प्रतिनिधी | सध्या तुरीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला असून यासाठी तूर उत्पादकांना अनुदान तत्वावर जैविक/रासायनिक निविष्ठा उपलब्ध करून द्यावात अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, जिल्ह्यातील प्रमुख कडधान्य पिकांपैकी महत्वाचे तूर पिकांचे जळगाव जिल्ह्यात ११७५३ हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झालेली आहे.सध्या तूर पिकावर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. या वर्षी खरीप हंगामात शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्याने तूर पिकाचे उत्पन्नाची अपेक्षा शेतकर्‍यांना असताना सध्या शेंगा पोखरणारी अळी मुळे ३० ते ४० टक्के उत्पन्नात घट होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. तुर पिकावरील शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ७५ % टक्के अनुदानावर जैविक/रासायनिक फवारणी निविष्ठा उपलब्ध करून द्याअशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमूद केले आहे की महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या क्रॉपसॅप (पिकावरील कीड व रोग सल्ला सर्वेक्षण प्रकल्प) मध्ये तूर पिकाचा देखील समावेश करण्यात आलेले असून आपण तात्काळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ७५ टक्के अनुदानावर फवारणी करीता जैविक/रासायनिक निविष्ठा तालुकास्तरावर उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून शेतकर्‍यांना तूर पिकावरील शेंडे पोखरणारी अळी नियंत्रण करणे सोयीचे होईल. तरी आपण माझ्या पत्राची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातील तालुकानिहाय लागवड पुढील प्रमाणे आहे. जळगाव – ७०४ हे., अमळनेर – ३२५ हे., एरंडोल – २३२ हे., धरणगाव – ३१९हे., पारोळा – ११२ हे., चाळीसगाव – ३७५ हे., पाचोरा – ८६१ हे., भडगाव – २६० हे., सध्या तूर पिक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या पिकाची प्रत्यक्ष शेतावर पाहणी करुन शेतकर्‍यांसमोर चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे की सध्या तूर पिकावर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.

या वर्षी खरीप हंगामात शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्याने तूर पिकाचे उत्पन्नाची अपेक्षा शेतकर्‍यांना असताना सध्या शेंगा पोखरणारी अळी मुळे ३० ते ४० टक्के उत्पन्नात घट होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. असे त्यांनी पत्रात नमूद केले असून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांना देखील निविष्ठा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली आहे.

Protected Content