भयंकर उष्णतेची लाट : जिल्ह्याधिकार्‍यांनी केले ‘हे’ आवाहन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या उष्णतेची प्रचंड लाट सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये ती कायम राहणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नागरिकांना आवाहन करत काळजी घेण्याचे सूचित केले आहे.

जळगाव जिल्ह्यात आगामी दिवसामध्ये वाढते तापमान आणि उन्हामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता वाढलेली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देवून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे . असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अमन मित्तल यांनी केले आहे.

या संदर्भात जिल्ह्याधिकार्‍यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात दिनांक १३/०५/२०२३ रोजी ४४.९ डिग्री सेल्सियस १५/०३/२०२३ रोजीचे अधिकतम तापमान हे ४३.२ डीग्री सेल्सियस तापमानाची नोंद झालेली आहे. सदर बाब लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , नगर परिषद, नगर पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभाग , महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, रेल्वे प्रशासन, शिक्षण विभाग, रस्ते परिवहन विभाग, पशु संवर्धन, वन विभाग, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा नियोजन अधिकारी, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम या विभागांनी उष्माघाताचे परिणाम कमी करण्यासाठी अल्प,मध्यम व दीर्घ मुदतीचे आराखडे तयार करणे बाबत सुचविले होते. उष्णतेची लाट अथवा उष्माघाटाचा विचार करतांना तपमाना व्यतिरिक्त हवेतील आर्द्रता, धुळीचे कण, हवेचे प्रदूषण या बाबी सुद्धा विचारात घेवून जिल्ह्यातील भौगोलिक व वातावरणीय बाबींचा विचार करून या बाबतचे नियोजन करणे आवश्यक आहे.

उष्णतेमुळे मानवी शरीरावर विशेषतः झोपडपट्टी मध्ये राहणारे, रस्त्याशेजारील अथवा फिरते विक्रेते, बस स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रचे ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे, विवाह सोहळे, बाजार समितीत काम करणारे, नियमित बाजार अथवा आठवडा बाजारातील विक्रेते येथे भेट देणारे वयोवृद्ध, लहान लेकरे, महिला यांच्यावर उष्णतेचे जास्त परिणाम दिसून येतो.

उष्माघाताची कारणे

उन्हामध्ये शारिरीक श्रमामुळे.
मजुरीचे कामे फार वेळ करणे.
कारखान्यांचे बॉयलर रुममध्ये व काच कारखान्यात काम करणे.
जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे.
घट्ट कपड्यांचा वापर करणे.
उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे ही उष्माघात होण्याची कारणे आहेत.

उष्माघाताचे लक्षणे

चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे.
शरीराचे तापमान खूप वाढणे.
पोटात कळा येणे.
शरीरातील पाणी कमी होणे.
त्वचा कोरडी होणे.
डोके दुखणे.
बेशुद्ध होणे अथवा अस्वस्थ होणे.
जोखीम गट.
५ पेक्षा कमी वयाची बालके
६५ पेक्षा वय जास्त असणारे जेष्ठ नागरिक
अधिक कष्टाची सवय नसणारी व्यक्ती.
धूम्रपान, मद्यपान करणारी व्यक्ती.
मूत्रपिंड, हृदय रोग, यकृत, त्वचा विकार , लठ्ठापणा, मधुमेह, उच्च रक्त दाब, इ. रुग्ण
अति आद्रता, वातानुकुलनाचा अभाव , शेत काम , कारखान्यातील काम करणारे कामगार , उष्णतेशी संबधीत व्यवसाय करणारे व्यक्ती.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे.

पुरेसे पाणी प्या , तहान लागलेली नसली तरी दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. जास्तच जास्त पाणी पिण्यात यावे.
घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा .
सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टीव्ही किवा वर्तमान पत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
हलकी , पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
बाहेर जातांना गॉगल्स, छत्री,टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा.
प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी / व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा पांढरा रुमाल बांधावा किवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे ,घरी तयार करण्यात आलेली लस्सी / ताक / कैरीचे पन्हे / लिंबू पाणी इत्यांदीचा नियमित वापर करण्यात यावा.
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
गुरांना / पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
पंखे ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी.
गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
कॉंक्रीट घराचे छतावर पांढरा रंग द्यावा.
टीन पत्र्याचे छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे.
छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहायाने झाकाव्यात.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या डऊचA चरहरीरीहींीर या ढुळींींशी, षरलशलेेज्ञ, कु. प वरील सूचना पहाव्यात.
जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार्‍या सूचना पहाव्यात.
उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी काय करू नये
लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
गडद , घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बाहेर तापमान अधिक असल्यास शाररीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे.
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयं पाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये.
मद्य सेवन , चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये. त्यामुळे डीहायड्रेशन होते.
उन्हात वाहने शक्यतो चालवू नये.
उष्माघाताचे लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा.
ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे.

दरम्यान, कलम २६ मध्ये जिल्हा प्राधिकरणाच्या अध्यक्षाचे म्हणजेच जिल्हाधिकारी यांचे अधिकार विषद केलेले आहे. त्यानुसार कलम ३० (२) ५,३१,३२,३३,३४ व कलम ४१ (२) तसेच ५१ ते ५६ अन्वये उष्माघाता बाबत दिनांक रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २३ /०३/२०२३ रोजी सर्व कार्यकारी यंत्रणा सोबत बैठक झालेली आहे व त्यात खालील प्रमाणे सूचना प्रत्येक विभागास देण्यात आलेल्या आहेत. तसा आदेश दिनांक २३/०३/२०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाने दक्ष राहून कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व कार्यकारी यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचारी यांना दिलेल्या आहेत. सोबत नागरिकांनी स्वतःच्या संरक्षणार्थ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शासनाने दिलेली मार्गदर्शक तत्वे, नियोजन व अंमलबजावणी साठी माहिती खालील प्रमाणे आहे.

मध्यम व दीर्घ स्वरुपाचे नियोजन

१. ग्रामीण व शहरी भागातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांना पर्यायी विचार करणे जेणेकरून तापमानात वाढ होणार नाही.
२. नाली व गटारे सुस्थितीत ठेवण्याकामी उपाय योजना कराणे .
३. प्रत्येक घराच्या छतावर पांढर्‍या रंगाचे आवरण करणे अथवा पांढरे आच्छादन करावे.
४. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या छतावर असल्यास त्या काळ्या रंग ऐवजी पांढर्‍या रंगाच्या असाव्यात.
५. शहरातील बाग बिगीच्यांमध्ये तसेच सार्वजनिक जागेमध्ये अथवा मोकळ्या जागेमध्ये अधिकाधिक झाडांची लागवड कराणे .
६. पर्यावरणास अनुकूल व स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड कराणे .
७. शहरातील पाण्याचे स्त्रोत , तलाव , विहिरी सुस्थितीत ठेवणे.
८. उष्ण लाट अनुरूप बिल्डींग प्लॅन बंधनकारक करणे.
९. घरे बांधणारे कारागीर / बिल्डर यांना तांत्रिक उष्ण लाट अनुरूप इमारती विषयक प्रशिक्षण देणे.
१०. झोपडपट्टी विकास प्रकल्प अंतर्गत व शासनाच्या विविध योजनेतून परवडणारी घरे बांधतांना वरील बाबींचा विचार करणे.
११. जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या सेवाभावी संस्था, नेचर क्लब , युथ क्लब , रोटरी क्लब , लायन्स क्लब इत्यादींना या कार्यक्रमात समावून घेणे.
१२. शाळा व कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये उष्ण लाट विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करणे.
१३. नागरी व ग्रामीण भागातील खुल्या / मोकळ्या जमिनीवर वृक्षरोपण करून पर्यावरण समतोल साधण्याचा प्रयत्न करणे.
१४. बाजार समित्या ,बस स्थानक ,रेल्वे स्थानक इत्यादी सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक सावली निर्माण होईल यासाठी उपाययोजना करणे.
१५. रस्तावर फिरते विक्रेते यांच्यासाठी शक्यतो सावलीची ठिकाणे निश्चत करणे.
१६. उन्हाळ्यात निर्माण होणारी विजेची टंचाई लक्षात घेता दीर्घ कालीन उपाय योजना म्हणून सर्व शासकीय , निम शासकीय कार्यालये सोलर एनर्जीवर चालतील यासाठी उपाययोजना करणे तसेच खाजगी आस्थापना व घरे यांना सोलर एनर्जी च्या वापराविषयी चालना देणारे उपक्रम हाती घेणे.
१७. रुफ वॉटर हार्वेस्टिंग , कुपनलिका पुनर्भरण, विहिरी पुनर्भरण करणे, तलावातील गाळ काढणे इत्यादी जलसंधारणाची कामे नागरी सहभागातून करणे.
१८. शहरामध्ये दररोज ये-जा करणारी लोकसंख्या विचारात घेवून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे जेणेकरून त्या ठिकाणी सावलीयुक्त निवारा उपलब्ध होईल.
१९. खुल्या जागेवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे.

शासकीय व निमशासकीय यंत्रणेकडून करावयाची कार्यवाही

१. उष्णलाट व्यवस्थापन कालावधी हा सर्वसाधारणपणे दरवर्षी १ मार्च ते १५ जून असा राहील.
२. नागरिकांच्या सहाय्यासाठी अथवा मदतीकरिता तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये १०७७, १०७०, १००,१०१,१०२,१०४, १०८,११२ हे संपर्क क्रमांक प्रसारित करण्यात यावेत.
३. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बोलविण्यात यावी. सदर बैठकीत लघु कृती आराखडा संबधित विभागाकडून तयार करून घ्यावा. झोपडपट्टी, गर्दीची ठिकाणी, कारखाने, व्यवसाय , वीट भट्टी व तत्सम व्यवसायामध्ये काम करणारे कामगार, ग्रामीण भागातील यात्रेची ठिकाणे , धार्मिक स्थळे इत्यादींचा विचार करून त्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा सर्व आरोग्य केंद्रावर आहे किवा नाही याची खात्री करावी.
४. आरोग्य विषयक बाबींसाठी संबधित जिल्ह्यांचे जिल्हा चिकित्सक हे संपर्क अधिकारी ( नोडल अधिकारी )म्हणून काम करतील व ते जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून आरोग्य सेवेविषयी प्रत्येक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुटीर रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य विषयी सोई सुविधा पूर्ण वेळ उपलब्ध राहतील याची खात्री करतील.
५. भारतीय हवामान उष्णतेच्या लाटे संदर्भात पूर्वसूचना अंदाज वर्तवण्यात येतात या संबधीची अद्ययावत माहिती प्राप्त करण्यासाठी व संकलित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे हवामान खात्याशी संबधित जिल्हा प्रादेशिक अधिकारी अथवा जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी दररोज खचऊ कडून माहिती घेवून जिल्हाधिकारी यांना अवगत करतील. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेची पूर्वसूचना येताच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रेस नोट स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्या ,रेडिओ, सोशल मिडिया, सचेत प्रणाली ध्वनीक्षेपक इत्यादींच्या माध्यमातून नागरिकांना सूचना व इशारा देणे.
६. एक मार्च पासून सर्व शासकीय रुग्णालयात उष्माघातामुळे दाखल होणार्‍या रुग्णांसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवावे. त्यात उष्माघातामुळे उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांची व उष्माघातामुळे मृत्यू होणार्‍या व्यक्तींची सविस्तर नोंद करून जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करावा. उष्माघातामुळे कोणत्याही व्यक्तीचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास वरील निकष तपासून मृत्यूचे कारण अचूक नोंद करावी.
७. उष्माघातामुळे कोणत्याही व्यक्तीचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास वरील निकष तपासून मृत्यूचे कारण अचूक नोंद करावी. सर्व जेनरिक औशधालये, हृदय विकारांशी संबधित रुग्णालये यांना सूचित करण्यात यावे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आवश्यक सूचना देवून पालन करण्याच्या सूचना सर्व खाजगी रुग्नालायास द्याव्यात.
८. शहरी भागातील शासकीय रुग्णालयात काही बेड/ खाटा राखीव ठेवून शीत कक्ष/वार्ड जाहीर करून त्यांची माहिती जिल्हाधिकार्‍यांना द्यावी.
९. सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानके या ठिकाणी पंखे सुरू राहतील व हवा खेळती राहील याची दक्षता संबंधित अधिकार्‍यांनी घ्यावयाची आहे.
१०. उष्णतेच्या लाटे संबंधी पूर्व सूचना देण्यात आलेली असल्यास वीज वितरण कंपनीकडून दुपारच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार नाही/ लोड शेडिंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
११. बाजार समिती, धार्मिक स्थळे, यात्रेची ठिकाणे अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पंखे व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी.
१२. सर्व शाळा व महाविद्यालये सकाळच्या सत्रामध्ये कार्यरत राहतील अशा पद्धतीने नियोजन करावे.
१३. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणार्‍या मजुरांना ’पीस रेट’ (झळशलश ठरींश) पद्धतीने (सकाळ व संध्याकाळच्या सत्रात कामाचे विभाजन करून) काम देण्याचे व शक्यतो दुपारच्या वेळी काम करणे टाळता येईल अशा पद्धतीने नियोजन करावे.
१४. शहरी भागातील सर्व बगीचे / उद्याने हे दुपारीच्या वेळी बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कामासाठी ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या नागरिकांसाठी, रस्त्याशेजारील विक्रेते व फिरते व्यापारी, रोजंदारीवरील कामगार यांच्या साठी अशी ठिकाणे दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी उपलब्ध असणे आवश्यक असल्याने सदर बगीचे/उद्याने दुपारच्या कालावधीत सुरु राहतील याची दक्षता घ्यावी..
१५. ५० वर्षापेक्षा जास्त वय असणार्‍या पोलीस कर्मचारी, एस.टी बस वाहक व चालक तसेच तत्सम काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वरील बाबी लक्षात घेऊन सोयीस्कर कामाच्या वेळा ठरवून द्याव्यात.
१६. उष्णतेच्या लाटे संबंधी पूर्व सूचना देण्यात आलेली असल्यास दुपारी दोन ते चार या कालावधीत मोर्चे प्रदर्शने यांना परवानगी देताना वरील बाबी विचारात घ्याव्यात.
१७. ज्या मजुरांना आगीच्या भट्टी समोर काम करायला लागते त्यांना काही ठराविक कालावधीनंतर विश्रांती देण्याच्या सूचना संबंधित मालकांना/ व्यवसायिकांना / कारखानदारांना द्याव्यात. अशा सर्व आस्थापनांची कारखाने निरीक्षक ( ऋरलींेीू खपीशिलींेी) यांनी तपासणी करावी व संबंधित आस्थापनांकडून वरील बाबीचे अनुपालन होईल याची खात्री करावी.
१८. उन्हाळ्यात व्यवसायिक इमारती, गोदामे, कारखाने अशा ठिकाणी आग लागण्याचे प्रकार दिसून येतात यासाठी अग्निशमन यंत्रणा वेळेवर उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी
१९. पाळीव प्राण्यांना वेळेवर व पुरेश्या प्रमाणात पिण्याचे पाणी व सावली उपलब्ध करून देण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रम स्थानिक प्रशासनाद्वारे राबवण्यात येईल.
२०. जिल्हा माहिती अधिकारी हे सातत्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या संपर्कात राहून उष्णतेच्या लाटे संदर्भात आलेल्या पूर्व सूचना व इशारे संबंधित भागातील लोकांना सतर्क करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांद्वारे पोहचवतील.

Protected Content