Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही : पालकमंत्र्यांचा पलटवार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आ. गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दात टिका केल्यानंतर आता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी धुळे येथे पत्रकारांशी बोलतांना शिवसेनेवर अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टीका केली होती. शिवसेनेची अवस्था ही गटारीतल्या बेडकासारखी असून भाजपच्या जीवावर मोठा झालेला हा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत या पक्षाचे चार खासदार आणि पंचवीस आमदार निवडून येतील की नाही अशी शक्यता धूसर असल्याचा टोला त्यांनी मारला होता.

दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी तर या प्रकरणी शिवसेनेकडून प्रतिक्रिया का आलेली नाही ? असा प्रश्‍न विचारून शिवसेनेला खिजवले देखील होते. या पार्श्‍वभूमिवर जळगावात पत्रकारांशी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधीत विषयावर भाष्य केले.
याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुंबईतील सभा ही ऐतिहासीक झाली असून याला कसा प्रतिसाद मिळाला हे सर्वांनी पाहिले आहे. आणि यामुळे गिरीश महाजन यांनी काय वक्तव्य केले याला महत्व नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते असा टोला मारत त्यांनी महाजन यांना फक्त जिल्ह्यातील बाबींवर बोलावे असे देखील सुचविले.

Exit mobile version