विशाखापट्टणम वृत्तसंस्था । रोहित व राहूलची विक्रमी भागीदारी आणि कुलदीपच्या हॅटट्रीकच्या मदतीने आज भारताने विंडीजचा दारूण पराभव करून एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
कायरन पोलॉडर्न नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाने आज अतिशय उत्तम फलंदाजी केली. रोहीत शर्मा आणि के.एल. राहूल यांनी दोघांनी शतके फटकावली. त्यांनी अनुक्रमे १५९ आणि १०२ धावा केल्या. आज विराट अयशस्वी ठरला तरी श्रेयश आणि ऋषभ पंत यांनी शेवटी टोलेबाजी केल्याने भारताने ५ बाद ३८७ अशी मोठी धावसंख्या उभारली. एविन लुईस आणि शाई होप यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. सलामीची जोडी फुटल्यानंतर हेटमायर आणि रोस्टन चेस अयशस्वी ठरले. यानंतर निकोलस पूरन आणि होप यांनी पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र मोहम्मद शमीने एकाच षटकात निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डला माघारी धाडले. यानंतर कुलदीप यादवने सामन्याच्या ३३ व्या षटकात शाई होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांना माघारी धाडत हॅटट्रीक नोंदविली. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक घोणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने याआधी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात हॅट्ट्रिक घेण्याची किमया केली होती. यानंतर कुणीही फलंदाज टिकाव धरू शकला नाही. विंडीजकडून पूरन ७५ तर होपने ७८ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी ३-३, रविंद्र जाडेजाने २ तर शार्दुल ठाकूरने एक बळी घेतला. विंडीजचा एक फलंदाज धावबाद झाला.