फळ पीक विम्याचे तात्काळ पंचनामे करून घ्यावेत – पालकमंत्री

जळगाव – लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । ‘ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी’मार्फत राबविण्यात येत असलेल्या फळपिक विमा योजनेच्या लाभासाठी “जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी आपल्या नुकसानीची माहिती कंपनीला तात्काळ कळवून नंतर पंचनामे करून घ्यावेत.” असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना अंबिया बहार सन २०२१-२२ करीता अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली असुन अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजना ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी मफत राबविण्यात येत आहे. जिल्हयात या आठवडयात वेगाचे वारे / वादळामुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकर्‍यांनी नुकसान झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासात संबंधीत कंपनीला कळविणे आवश्यक असते. या अनुषंगाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी आपल्या नुकसानीची माहिती ही कंपनीला तात्काळ कळवून नंतर पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष करून याचा केळी पीकाला फटका बसला आहे. या पार्श्‍वभूमिवर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबत कंपनीच्या नियमानुसार शेतकर्‍यांनी नुकसानीची तात्काळ माहिती देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ना. गुलाबराव पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आवाहन केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना अंबिया बहार सन २०२१-२२ करीता अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली असुन अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजना ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी मफत राबविण्यात येत आहे. जिल्हयात या आठवडयात वेगाचे वारे / वादळामुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकर्‍यांनी नुकसान झालेल्या हानीची माहिती ७२ तासात विमा कंपनीला पूर्व सुचनाव्दारे  त्वरीत कळविणे आवश्यक आहे. वेगाचे वारे / वादळामुळे फळपिकाचे नुकसान झालेले आहे, अश्या नुकसानग्रस्त विमाधारक शेतकर्‍यांनी संबंधीत विमा कंपनी, महसुल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तीक पातळीवर फळपिकाचे नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन घ्यावेत.

यात पुढे म्हटले आहे की, दिनांक ८ व ९ जून २०२२ रोजी झालेल्या केळी पिकाच्या नुकसानीची सुचना काही तांत्रिक कारणामुळे शेतकरी देऊ शकले नाहीत, अश्या शेतकर्‍यांनी दिनांक १५जून २०२२ पर्यंत विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात जाऊन नुकसानीची माहिती क्रॉप इन्शुरन्स ऍपव्दारे करुन द्यावी. तसेच ज्या शेतकर्‍यांचे फळपिकांचे दोनदा नुकसान झालेले आहे, अश्या शेतकर्‍यांच्या दुसर्‍या नुकसानीची सुचना क्रॉप इन्युरन्स ऍपव्दारे नोंदं होत नसल्याने, त्यांनी विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात नुकसानीची ऑफलाईनव्दारे प्रपत्र – २ मध्ये माहिती भरुन सुचना द्यावी.

यासोबत फळपिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम गावपातळीवर विमा कंपनीमार्फत सुरु असुन शेतकर्‍यांनी मोबाईल चालू ठेवावा तसेच शेतकर्‍यांनी पंचनामे पूर्ण करण्यासाठी विमा कंपनीला सहकार्य करावे. तसेच विमा कंपनीला पूर्व सूचना केल्याच्या पाच दिवसात विमा कंपनी मार्फत होणारे पंचनामे पूर्णत्वास आले नाही तर पुढील पेरणीस उशीर होऊ नये म्हणून शेतकरी हितासाठी नुकसान झालेल्या पिकाचा/शेताचा पंचनामा करण्यासाठी फोटोसुद्धा ग्राह्य धरण्यात येईल. सदर नुकसानीचे पंचनामे योजनेच्या विहित कार्यपध्दतीनुसार करण्यात येत असल्याने, त्यासाठी शेतकर्‍यांकडुन कोणतेही शुल्क आकारले जात नाही, त्यामुळे कोणी पैसे मागत असल्यास देऊ नये.

नैसर्गिक आपत्तींमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करण्यासाठी शेतकरी बांधवांनी बांधावर वारारोधक म्हणून अनुदानित बांबुसारख्या पिकांची लागवड करावी असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मा. जिल्हा परिषद सीईओ पंकज आशिया, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे,  जिल्हा शेतकरी तक्रार निवारण समिती सदस्य सीए. हितेश आगीवाल, विमा कंपनी प्रतिनिधी अतुल झंकार, नितीन कुमार, कुंदन बारी, शेतकरी दगडू चौधरी, डॉ. सत्वशील जाधव, किरण पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content