मुंबई (वृत्तसंस्था) पाकिस्तान विरोधातील कारवाई, कलम 370 हटवणे, ट्रिपल तलाक कायदा याला आमचा पाठिंबा आहे. त्याबद्दल मोदी सरकार, अमित शाह यांचे वेळोवेळी अभिनंदनही केले आहे. पण, आता देशाला आर्थिक खाईत लोटण्याचे समर्थन कसे करणार?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर संजय राऊत यांनी संसदेत मोदी सरकारची मुक्तकंठाने तारीफ केली होती. मात्र, कौतुकाचे हे दिवस सरल्यानंतर राऊत यांनी केंद्राला आर्थिक वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊत यांनी आपले विचार मांडले आहेत. योग्य वेळी योग्य त्या गोष्टींचे कौतुक केलेच पाहिजे. पण, ज्या लोकसभा निवडणुका बेरोजगारी, आर्थिक मंदीच्या विषयांवर व्हायला हव्या होत्या त्या इतर मुद्द्यांवर झाल्या असल्याचे ते म्हणाले. आज ऑटोमोबाईल सेक्टर, लहानमोठे उद्योगधंदे धोक्यात आहेत.
लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. लोकांना जीएसटी काय, नोटबंदीमुळे काय झाले याच्याशी घेणं-देणं नाही. त्यांना त्यांची रोजीरोटी महत्वाची आहे. सरकारच्या कोणत्याही निर्णयाने जर रोजगार जात असेल तर असा निर्णय लोकांच्या दृष्टीनं घातकच आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि अनुच्छेद ३७० रद्द करणे निश्चितच देशभक्तीची कृती आहे. मात्र, रोजगारनिर्मिती आणि सध्या असलेल्या नोकऱ्या वाचवणे हे अधिक देशभक्तीचे कार्य ठरेल. मात्र, नेमकी याठिकाणी देशभक्ती कमी पडत असल्याचा अप्रत्यक्ष टोला संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे.