Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नरेंद्र मोदी धृतराष्ट्र झालेत का ? – सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई – “महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या झाली आणि ते दाबण्यासाठी अजयकुमार बिश्त यांचे उत्तर प्रदेश सरकार बेफाम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र झाले का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पाहत आहे अशा शब्दांत काँग्रेसने योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सचिन सावंत यांनी घणाघाती टीका केली आहे.  ते म्हणाले की, “उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये ज्या पीडित परिवाराला दिलासा दिला पाहिजे त्याऐवजी जिल्हाधिकारी जाऊन त्यांना धमक्या देत आहेत, त्यांचे फोन काढून घेतले जात आहेत, त्यांना मारहाण केली जात आहे. हा किळसवाणा प्रकार संपूर्ण देशाने पाहिला आहे. दुसरीकडे पीडित परिवाराला राजकारणीच नव्हे तर माध्यमांनाही भेटू दिले जात नाही. माध्यमांची जाहीर गळचेपी सुरू आहे. त्या छोट्या गावाला एका मोठ्या पोलीस छावणीचे स्वरुप आलेले दिसत आहे.”

“महिला पत्रकारांनाही अत्यंत ह्रद्य शून्यतेची वागणूक दिली जात आहे, हे सर्व महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या खासदारानांही धक्काबुक्की करण्यात आली. त्यांनाही पीडित परिवाराला भेटू दिले नाही, हेही देशाने पाहिले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक पीडितेवर बलात्कारच झाला नाही, असा संतापजनक कांगावा करत आहेत. तिथले अतिरिक्त जिल्हाधिकारी महिला पत्रकारांशी अत्यंत बेजबाबदार व हीन पातळीवर संवाद करत आहेत. सत्तेने बेधुंद झालेल्या व अहंकारीवृत्तीच्या आदित्यनाथ सरकारचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जाहीर निषेध करत असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज आहे हे स्पष्ट होत असून हे अत्याचारी सरकार तात्काळ बरखास्त झाले पाहिजे हि मागणी देखील त्यांनी केली.

Exit mobile version