‘बाबरी’साठी कुणी यादी देऊन गेलं नव्हतं : गुलाबरावांचा टोला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी खोचक टोल्याच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मुंबईतील बुस्टर सभेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. यात त्यांनी बाबरी मशीद पतन प्रकरणात शिवसेनेचा कोणताही रोल नसल्याचा दावा करत याऊलट आपण तेथील तुरूंगात असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या दाव्यावरून आता शिवसेना नेत्यांनी प्रति हल्ले करण्यास प्रारंभ केला आहे. यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यासाठी कुणी यादी देऊन गेलं नव्हतं, त्याठिकाणी सर्वजण कारसेवक म्हणून गेले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपवर जेवढे आरोप झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक आरोप शिवसेनेवर झाले. कोणी काय केलं, यापेक्षा त्याठिकाणी आता राममंदिर उभं राहतंय, याला महत्त्व आहे, सर्वांनी मिळून त्या रामंदिराची आरती करूया, असा माझा फडणवीसांना सल्ला आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Protected Content