Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केळी उत्पादकांना तात्काळ पीक विम्याचा लाभ द्या : अमोल जावळे यांची मागणी

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या भयंकर उन्हाळ्यात तापमानाने पंचेचाळीशी ओलांडली असल्याने नियमानुसार केळी उत्पादकांना फळ पीक विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

या संदर्भात पुणे येथील कृषी आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यात लागू करण्यात आलेल्या हवामानआधारित फळ पिक विमा योजनेतील केळी पिकासाठी लागू करण्यात आलेल्या प्रमाणकांमध्ये लागू असलेल्या जादा तापमान ह्या निकषात असलेल्या १ ते ३१ मे दरम्यान ५ दिवस तापमान ४५ डिग्री पेक्षा जास्त असल्यास हेक्टरी ४३,५००/- देय आहेत. या अनुषंगाने अलीकडेच जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल सह अन्य सर्व तालुक्यांत या कालावधीत सदरील तापमान ४५ डिग्री पेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जास्त तापमान असल्यामुळे शेतकर्‍यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान होत असून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. शेतकरी अत्यंत मेटाकुटीस आलेले असून शेतकर्‍यांना ह्या फळ पिक विमा योजनेतून त्वरित भरपाई देण्यास संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी अमोल हरीभाऊ जावळे यांनी या निवेदनात केली आहे.

Exit mobile version