Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन दिवसात ई-केवायसी करा – तहसिलदार कैलास चावडे

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या आदेशानुसार पाचोरा तालुक्यात उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एम. किसान योजनेचा लाभ पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

दरम्यान, हे ई-केवाय‌सी करण्याचे काम कुणी करावे ? यात सुरवातीला राज्य शासनाचा कृषी विभाग व महसूल विभाग यांच्यात वाद सुरू झाला होता. मात्र अखेर हे काम महसूल विभागाने पुर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे.

पाचोरा तालुक्यात मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल यांनी अद्याप पावेतो १० हजार शेतकऱ्यांचे ई. के. वाय. सी. पुर्ण केले असून अद्याप २६ हजार शेतकऱ्यांचे ई. के. वाय. सी. करण्याचे काम बाकी आहे. हे उद्दिष्ट पुढील दोन दिवसात साद्य करावयाचे असल्याने शेतकरी बांधवांनी जवळचे सेतु सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयातील अॉपरेटर, महाईसेवा केंद्रात जावून आपले ईकेवायसी करुन घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे यांनी केले आहे. अन्यथा पी. एम. किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले, असेही उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

 

Exit mobile version