जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज एरंडोल येथील ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रास भेट दिली. कापूस खरेदी प्रक्रिया, कापसाची वर्गवारी तसेच अवकाळी पावसामुळे कापसाचे घटलेले उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या अडचणीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांकडून जाणून घेतल्या.
कापूस खरेदी केंद्र व शेतकऱ्यांशी चर्चा करतांना जिल्हाधिकाऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रातील बाजार हमीभाव ७०२० रूपयांपेक्षा शेतकऱ्यांना का मिळत आहे. याची कारणमीमांसा जाणून घेतली. एरंडोल मधील शेतकऱ्यांचा कापूस राजस्थान तसेच दक्षिण भारतात जात आहे. याबाबत दळणवळण व्यवस्था कशी सुधारता येईल. यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले की, जिल्ह्यातील ७ तालुक्यात अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कापूस पीक विमा अंतर्गत ७३ कोटींची नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली आहे.