Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पदाचा मान असावा अभिमान नसावा ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव प्रतिनिधी:- कुणालाही पदाचा मान असावा मात्र अभिमान नको…या पध्दतीने आपण पालकमंत्री असल्याचा मान असला तरी याचा अभिमान बाळगत नसून सर्वसामान्यांच्या हिताचा आजवर घेतलेला वसा या पुढे देखील कायम राहिल अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते हणमंतखेडा, चावलखेडा व वाघळूद खुर्दसह अन्य गावांमध्ये विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हणमंतखेडा, चावलखेडा व वाघळूदसह परिसरातील गावांमध्ये रस्ते काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक ,शेत पाणंद रस्ते, भूमिगत गटारी व शौचालय बांधकाम आदी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले.

हनुमंतखेडा येथिल आयोजित कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, हणमंतखेडा येथील ग्रामस्थांसाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असूनक लागलीच मंजुरी देणार आहे. परिसरातील ग्रामस्थांसाठी जिव्हाळ्याचा असणार्‍या सोनवद बंधार्‍याचा प्रश्‍न लागलीच मार्गी लागणार आहे. गिरणा बंधार्‍याची उंची वाढविणे, अहिरे येथील पूल आदी प्रश्‍न देखील सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परिसरातील शेतकर्‍यांसाठी अंजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. पाटील यांनी दिली.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पदे येतात आणि जातात. मात्र कुणी याचा अभिमान बाळगता कामा नये. एक साधा शिवसैनिक म्हणून जनसेवेचा वसा घेऊन आपण वाटचाल सुरू केली असून ती भविष्यातही कायम राहणार आहे. राजकारणात विरोधकांचे काम टिका करणे हे असते. यानुसार ते टिका करण्याचे काम करत असले तरी आम्ही सातत्याने जनसेवेचे काम करत असल्याचा टोला देखील त्यांनी मारला. पिंप्री गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या परिसरातील जनतेच्या समग्र विकासाची कामे या पुढे देखील सुरू राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. तर हणमंतखेडा येथील ग्रामपंचायतीवर भगवा फडकावण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

यावेळी मनोगतात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव गुलाबराव वाघ यांनी सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच हा सक्रिय व शासनाच्या योजना खेचून आणणारा असावा. यासाठी शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवावी असे आवाहन केले. तालुका प्रमुख गजानन पाटील, पं. समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा प. स. गोपाल चौधरी व संजय पाटील सर आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी हनुमंतखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य वसंत सोनवणे , मोहिद्दिन पटेल यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच येथील जयेश रमाकांत पाटील हा नीट परीक्षेत नैपुण्य मिळाल्याबद्दल तसेच समाधान पाटील उर्फ बंडू पाटील यांनी कोरणाच्या प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या सेवेबद्दल त्यांचा पालकमंत्री ना.पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पं.स.चे सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि. प. सदस्य गोपाल बापू चौधरी, तालुका प्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, डी. ओ. पाटील, युवासेनेचे पवन पाटील, दामुअण्णा पाटील, अनिल पाटील, मंगल अण्णा पाटील, बोध बुद्रुक सरपंच रतिलाल देसले राजू पाटील, चावलखेडा सरपंच राजू आणि उपसरपंच आवरून पाटील पोलीस पाटील गोपाल पाटील हुकुम मास्तर शाखाप्रमुख समाधान पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य ,भागवत पाटील शाखाप्रमुख सुनील पाटील, उपशाखा प्रमुख विश्वनाथ पाटील, प्र.गटविकास अधिकारी श्री धनगर, शहर प्रमुख नगरसेवक पप्पू भावे राजेंद्र महाजन, बंटी पाटील , डॉ. प्रशांत जगताप,नवल बापू पाटील, बबन पाटील, एल के पाटील सर, बाळू सपकाळे, सा.बा.विभागाचे शाखा अभियंता अनिल लांडगे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू सपकाळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रशांत पाटील सर यांनी मानले.

Exit mobile version