नियमांची पायमल्ली करून प्रभागांची निर्मिती : महाजन यांची हरकत

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना तयार करतांना राजकीय दबावाखाला प्रभागांची रचना करण्यात आल्याचा आरोप धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी करून यावर हरकत घेतली आहे. या हरकतीवर प्रशासन काय निर्णय घेणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. स्वतंत्र प्रभागाची दिल्यास मुस्लीम समाज कशाप्रकारे विभागाला गेला आहे?, हे स्पष्टपणे दिसून येईल. प्रत्येक प्रभागाचा नकाशा स्वतंत्र तयार करण्यात आलेला नाही. प्रभाग क्रमांक ११ हा बनवितांना एनएच ६ हा मुख्य रस्ता तसेच त्यावरील सावित्रीबाई फुले उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा भाग एकाच प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.

धरणगाव नगरपालिकेत राजकीय हिताच्या दृष्टीने व राजकीय दबावाला बळी पडून सदरची प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सदर रचना ही त्रयस्त यंत्रणेमार्फत उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकार्‍याच्या नियंत्रणाखाली तयार करण्यात यावी, अशी मागणी देखील जितेंद्र महाजन यांनी केली आहे.

महाजन यांनी पुढे म्हटले आहे की, प्रगणक गटनिहाय माहिती देण्यात आलेली नाही. तसेच नकाशावर देखील त्यासंबंधी कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ प्रगणक गटाचा प्रभाग रचना तयार करतांना कुठलाही विचार करण्यात आल्याचे दिसून येत नाही. जनगणना प्रभागांच्या सीमा दर्शविण्यात आलेल्या नाहीत. परिशिष्ट क्रमांक ७ नोटीस बोर्डावर दर्शविण्यात आलेला नाही. तसेच त्याची सत्यप्रत देण्यात यावी. हरकत व सूचना सादर करण्याच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारण्याची व्यवस्था नगर परिषद कार्यालयात करण्यात आलेली नाही. तसेच संबंधितांना पोच पावती देतांना दिनांक व वेळ नमूद करण्यात यावे. हरकती व सूचनांना क्रमांक देण्यात यावेत, अशी कुठलीही व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही. प्रत्येक प्रभागात मुद्दाम हून मुस्लीम वस्ती, गरीब वस्ती समाईकरित्या विभागून समाविष्ट करण्यात आलेला आहे. तसेच, प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लाय ओव्हर इत्यादींचा विचार न करता सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच, समाजानुसार भाग विभागलेले असून देखील समाज दर्शविणारे भाग नकाशात दाखविण्यात आलेले नाहीत. जसे की, लहान माळी वाडा, मोठा माळीवाडा, भोई वाडा, पारधी वाडा, हमाल वाडा, मुस्लीम भाग, बेलदार मोहल्ला, गौतम नगर या भागांचे विभाजन स्पष्टपणे दिसून येत नाही.

जे प्रभागानुसार प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर दिसून येते.याच्या अंतर्गत विविध समाजाचा उदा: माळी समाज, तेली समाज, मुस्लीम समाज, दलित समाज, ज्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भोई समाज यांचा भाग फोडलेला दिसून येतो असे महाजन यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, प्रभाग रचनांवर हरकती घेण्यासाठी आज शेवटची मुदत असून या हरकतींचे प्रशासनातर्फे निराकरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जितेंद्र महाजन यांच्या हरकतीवर प्रशासन काय निर्णय घेणार ? याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Protected Content