जालना-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज किल्ले रायगडावर येत आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर किल्ले रायगडावर मनोज जरांगे पाटील आशिर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर धनगर, मुस्लीम त्यांच्यासाठी लढा देणार असं अनेकदा म्हटलं आहे. याबाबत आज माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी प्रश्न केला असता जरांगे म्हणाले, आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. हा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, धनगर आणि मुस्लीम बांधवांना आरक्षण कसं देत नाहीत तेच बघतो.
त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे असं माझं मत आहे. पण, त्यांनीही म्हटलं पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे. धनगर बांधव आणि मुस्लीम बांधव म्हणाला तर मग, मी पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही असं म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासाठी आम्ही भांडत राहणार, बोलत राहणार आहे. ज्यावेळी मराठा समाजाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईल तेव्हा गुलाल उधळला जाईल आणि महादिवाळी साजरी केली जाईल असं जरांगे यांनी म्हटलं आहे.