गेल्या ७५ वर्षात हवा तसा विकास झाला नाही : सरसंघचालक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षांमध्ये हवा तितका विकास झाला नसल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. यामुळे त्यांनी मोदी सरकारला देखील कानपिचक्या दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित संत ईश्वर सन्मान-२०२१ कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या स्थितीवर परखड भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांमध्ये आपला देश ज्यापद्धतीनं पुढे जायला हवा होता. त्यापद्धतीनं काही आपला विकास झालेला नाही. देशाला विकासाच्या मार्गावर आपण आणलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. पण इतकी वर्ष तसं झालं नाही त्यामुळेच आपण पुढे जाऊ शकलो नाही.

जगातील सर्व देशांचे मिळून आतापर्यंत जितके महापुरूष झाले असतील तितके महापुरूष गेल्या २०० वर्षात एकट्या भारतात झाले आहेत. या प्रत्येक महापुरूषाचं जीवन आज प्रत्येकाच्या सर्वांगीण जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारं आहे. खोटं जगात कधीच टीकत नाही. असत्यानं कितीही प्रयत्न केला तरी विजय नेहमी सत्याचाच होतो, असंही मोहन भागवत म्हणाले.

तसेच याप्रसंगी मोहन भागवत यांनी जय श्री रामचे नारे लगावणार्‍यांनाही कानपिचक्या दिल्या. जय श्री रामचा नारा आपण मोठ्या जोशात देतो. नारेबाजी करण्यात काहीच गैर नाही. पण भगवान राम यांच्यासारखं आपलंही आचरण असायला हवं, असं मोहन भागवत म्हणाले.

Protected Content