Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दादा भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

जळगाव प्रतिनिधी । पर्यावरणातील बदल आणि ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी कृषी व महसुल विभागाने सहकार्य करण्याच्या सुचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिल्यात.

मंत्री श्री. भुसे यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणे व सामरोद शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतक-र्यांशी संवाद साधला.

जामनेर तालुक्यातील काही गावात चार दिवसापूर्वी झालेल्या चक्री वादळामुळे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ओझर येथे घरावरील पत्रा उडून बैलावर पडल्याने बैल गंभीर जखमी झाला होता. मंत्री श्री. भुसे व आमदार किशोर पाटील यांनी आज  बैल मालक श्री. रमेश माळी यांची भेट घेतली. पशु वैद्यकीय अधिका-र्यांनी ३० टाके घालुन बैलाचे प्राण वाचविले. बैलाच्या उपचारावर होणारा खर्च शासन करेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री भुसे यांनी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी ए बी चोपडे यांना नुकसानीचे पंचनामे, तातडीची मदत व पिक विम्याबाबत सुचनाही दिल्यात.

कृषी मंत्री भुसेंची संवेदनशीलता

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे तसे संवेदनशील मनाचे. मग, ते शेतकऱ्याच्या शेतात जावून त्याच्याशी संवाद साधणे असो, शेतकऱ्यांसोबत नांगरणी, पेरणी असो वा शेतमजुराच्या चंद्रमौळी झोपडीत जावून झुणका- भाकरीचा आस्वाद घेणे असो. अशा प्रत्येक घटनेतून कृषी मंत्री श्री. भुसे यांचे संवेदनशील मन दिसून येते.

अशीच आणखी एक घटना आज दुपारी घडली. जामनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात घरावरील पत्रे उडून बैल जखमी झाला होता. या बैलाला पशुवैद्यकांनी 30 टाके घालून त्याचे प्राण वाचविले. ही घटना आज चाळीसगाव, भडगाव आणि पाचोऱ्याच्या दौऱ्यावर असलेल्या श्री. भुसे यांना समजली. हा दौरा संपल्यानंतर त्यांनी तेथूनच ओझर, ता. जामनेर येथे जाण्याचे ठरविले. या भागातील नुकसानीची पाहणी करून ते थेट बैल मालक शेतकरी रमेश भगवान माळी यांचे घर गाठले. तेथे त्यांनी या बैलाच्या प्रकृतीची माहिती शेतकरी श्री. माळी यांच्याकडून घेतली. तसेच या बैलाच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगत शेतकरी श्री. माळी यांना दिलासा दिला.

 

Exit mobile version